टेमुर्डा येथे देशी दारू दुकानावरून वाद पेटला; ग्रामस्थांचा तीव्र विरोध, परवानगी स्थगित करण्याची मागणी
वरोरा -चेतन लूतडे -28/5/26
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे देशी दारू दुकान (CL-III) सुरू करण्याच्या निर्णयावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, मुंबई यांनी दि. 27 मार्च 2026 रोजी बंगाली कॅम्प, मुल रोड, चंद्रपूर येथील CL-III परवाना टेमुर्डा येथे स्थलांतरित करण्यास मंजुरी दिल्यानंतर गावात विरोधाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीचा अर्ज सादर करून परवानगी तात्काळ स्थगित करण्याची मागणी करीत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित दारू दुकान हे पूर्णपणे नागरी वस्तीमध्ये येत असून परिसरात शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, तलाठी कार्यालय, खाजगी दवाखाने, मंदिरे तसेच आठवडी बाजार आहे. त्यामुळे येथे दारू दुकान सुरू झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महिला सुरक्षा, तरुण पिढीचे भविष्य आणि सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी आपल्या अर्जात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी (NOC) घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला असून ग्रामसभेत या संदर्भात कोणताही ठराव मंजूर नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. उलट गावात दारूबंदीचा अधिकृत ठराव पूर्वीच मंजूर करण्यात आलेला असल्याचे अर्जात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय अलीकडे झालेल्या ग्रामसभेत पुन्हा एकदा गावकऱ्यांनी एकमुखी विरोध नोंदविल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांनीही या प्रकरणात निवेदन दिली असून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. टेमुर्डा येथे देशी दारू दुकानास मंजुरी देऊ नये, अशी मागणीही करणार आहे. त्यांच्या पत्रात टेमुर्डा हे 30 ते 35 गावांची बाजारपेठ असलेले मध्यवर्ती ठिकाण असल्याचे नमूद करण्यात आले असून, दारू दुकान सुरू झाल्यास अवैध धंदे वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच, या प्रकरणी न्यायालयीन हालचालीही सुरू झाल्या असून नागपूर येथे अॅड. एस. एस. गोडबोले यांनी कॅव्हेट अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. भविष्यात या आदेशाविरोधात कोणतीही याचिका दाखल झाल्यास संबंधितांना आधी सुनावणीची संधी मिळावी, यासाठी हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सध्या टेमुर्डा गावात या मुद्द्यावर वातावरण तापले असून ग्रामस्थांनी प्रशासनाने लोकभावना लक्षात घेऊन निर्णय रद्द करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
.................
Comments
Post a Comment