करंजी घाटातून अवैध रेती वाहतूक उघड; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
वरोरा/चेतन लूतडे/27/5/26
वरोरा : वरोरा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई करत करंजी वर्धा नदी घाटातून अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून मोठी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा एकूण ४ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तरवार हे पोलीस कर्मचारी व पंचांसह चेकगस्त व गुड मॉर्निंग पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, करंजी वर्धा नदी घाटातून ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे विनापरवाना रेती वाहतूक केली जात आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी नगर परिषद फिल्टर टँकजवळ वरोरा-तुळाना रोडवर पहाटे नाकाबंदी केली. काही वेळानंतर तुळाना रोडकडून येणारा ट्रॅक्टर थांबवून चौकशी करण्यात आली. चालकाने आपले नाव सतीष देवराव मालेकर (वय 34), रा. विठ्ठल मंदिर वार्ड, वरोरा असे सांगितले.
पोलिसांनी ट्रॅक्टरला जोडलेल्या लाल रंगाच्या विनाक्रमांक ट्रॉलीची पाहणी केली असता त्यात एक ब्रास रेती आढळून आली. रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता चालकाकडे कोणताही वैध पास नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर रेती करंजी येथील वर्धा नदी घाटातून चोरीने भरून आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या जप्ती पंचनाम्यात ५,५०० रुपयांची रेती, आयशर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. MH-34-L-9908 किंमत ३ लाख रुपये आणि १ लाख रुपयांची विनाक्रमांक ट्रॉली असा एकूण ४,०५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सतीष देवराव मालेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
याच मार्गावरून शहरामध्ये अवैद्य वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी वाळूघाट लिलावात नसल्याने वनी मार्ग वाळू बोलावली जात आहे. दरवर्षी ठराविक लोक हे वाहतूक करीत असतात. यांच्या ट्रॉलीला किंवा ट्रॅक्टरला नंबर नसतो. पोलीस स्टेशन पासून, घाटापर्यंत वरोरा शहरापर्यंत 10 ते 15 ट्रॅक्टर मालक नौकर गॅंग बनवून पहारा देत असतात. यांच्या सुद्धा टू व्हीलर ला नंबर नसतो. पोलिसांची किंवा महसूल अधिकारी ची चाहूल लागतात. एकमेकांना मेसेज पोहोचव अलर्ट केल्या जाते. हि यंत्रणा गेल्या कित्येक वर्षापासून अशीच सुरू आहे . महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा अपुरी पडत असल्याने वाळू तस्करांचे चांगलेच फावत आहे.
Comments
Post a Comment